![]() |
मराठी कविता - वसंत |
मराठी कविता - वसंत
वसंत ऋतू हा भारतीय ऋतूंच्या यादीतील एक अत्यंत आनंददायक आणि सुंदर ऋतू आहे. हा ऋतू साधारणतः फेब्रुवारीपासून सुरु होतो आणि मार्च- एप्रिल पर्यंत टिकतो. वसंत ऋतूचे मुख्य ठळक वैशिष्ट्य म्हणजे या ऋतूमध्ये सर्वत्र गोड सुगंध, फुलांचा गालिचा, आणि समृद्ध निसर्ग पाहायला मिळतो. या ऋतूमध्ये हवामान सौम्य आणि हलके असते, आणि फुलांचे रंग-बेरंगी दृश्य वातावरणात पाहायला मिळतात.
वसंत ऋतू येताना वातावरण थोडं गार आणि ताजं होतं, आणि सृष्टीत रंगांची चमक वाढते. पक्ष्यांच्या गाण्यामुळे वातावरण अगदी आनंदित आणि ऊर्जावान होते. हा ऋतु आपल्या संस्कृतीमध्ये विविध उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो, जसे की होळीचा उत्सव, धूलिवंदन, रंग-पंचमी, महाशिवरात्री, गुढी पाडवा इत्यादी उत्सव या ऋतू मध्ये येतात. वसंत ऋतूच्या आगमनामुळे निसर्गात एक नवीन उत्साह येतो आणि प्रत्येक गोष्ट हसतमुख होते. हसरा निसर्ग या ऋतू मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तर या ऋतू ला ऋतूंचा राजा असे म्हणते जाते.
🌸 वसंत 🌸
आसमंत सारा खुलूनी आला ,
नवचैतन्य प्रफुल्लित वसुंधरा,
हर्षूनी वाहे मंद-गंध वारा,
फुला-फुला तून वसंत सारा ।।१।।
निरभ्र सारे आभाळ झाले,
ढग हे सारे पळूनी गेले,
अमराईला बहर चढला,
कोकीळ ध्वनी हा कानी आला ।।२।।
सप्त-सुरांत गुंफुनी वारे,
चहू दिशांसी फिरुनी आले,
रंग उधळण ही चोहीकडे,
ऋतू राजा चे काम बडे ।।३।।
बोरी-बाभळी भरुनी आल्या,
वृक्ष ही सारे डोलू लागले,
फुलांचा तो आनंद पाहुनी
पक्षी ही गीत गाऊ लागले ।।४।।
मोर पिसारा फुलूनी आला,
अमराई मध्ये डोलू लागला,
सुगंध उरात भरूनी सारा,
थुई-थुई, थुई-थुई नाचू लागला ।।५।।
सुगरणीचा खेळ सुरू हा,
बांधून घरटे धन्य तरू हा,
भाव कोमल काळजातील
साद घाली सोबतीला ।।६।।
सूर्य किरण हे कोमल झाले
घरट्यातून खग उन्हात आले,
थव्या-थव्यातून चिऊ-चिऊ दाटे,
मनमोहक सारे ते गीत वाटे।।७।।
हिरवी पाने हिरवे आंगण,
हिरवे डोंगर हिरवे चंदन,
पीक धान्याचे ते ही हिरवे,
नववधू चे हे शालू हिरवे ।।८।।
धरती चे चैतन्य नवे हे,
पाहुनी मन हर्षूनी गेले,
उधाण आले सौंदर्याला,
वसुंधरेच्या नव्या रूपाला ।।९।।
**********
लेखन ✒️✒️📝
प्रा. जनार्दन लक्ष्मण साबळे.
मो. 9921762185.
कविता आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया वरील व्हॉटस् ॲप नंबर वर जरुर लिहा तसेच आपल्या मित्र मंडळींना हि कविता पाठवा.
ConversionConversion EmoticonEmoticon